ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासनतास ताटकळत ठेवल्याने संताप; मागच्या दाराने व्यवहार उरकत असल्याचे आरोप
सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, येथील कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोस्टाच्या विविध बचत योजना आणि आर्थिक व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असतानाच, ओळखीच्या व्यक्तींचे आणि एजंटांचे व्यवहार मागच्या दाराने उरकले जात असल्याचे चित्र शनिवारी, ४ एप्रिल २०२६ रोजीही दिसून आले.
सेलू येथील मुख्य टपाल कार्यालयात बचत खाते, मुदत ठेव, सुकन्या समृद्धी योजना आणि आवर्ती ठेव यांसारख्या विविध योजनांच्या देवघेवीसाठी दररोज मोठी गर्दी असते. विशेषत: मार्च एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक असतात. मात्र, येथील खिडकीवरील व्यवहार अत्यंत संथ गतीने चालत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकडे दुर्लक्ष करून काही कर्मचारी ओळखीच्या व्यक्तींची कामे प्राधान्याने करत असल्याचा आरोप संतापलेल्या ग्राहकांनी केला आहे. यामुळे भर उन्हात आणि गर्दीत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांचा संयम सुटत असून कार्यालयात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
दुसरीकडे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या खिडकीवरही गोंधळाचे वातावरण आहे. या खिडकीवर नियुक्त असलेले कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने १ ते २ तासांपासून ग्राहकांना ताटकळत थांबावे लागले. अन्य खिडक्यावरही कर्मचारी जागा सोडून कार्यालयात इतरत्र फिरत असतात. टपाल विभागाच्या या नियोजनाअभावी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सेलूतील पोस्ट ऑफिसच्या कामकाजाचा दर्जा खालावत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कामकाजात शिस्त आणावी आणि सर्वसामान्य ग्राहकांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.





