धर्माच्या ऐक्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज : शंकर दापके
सेलू : येथील साईबाबा मंदिर सभागृहात ५ एप्रिल रोजी विराट हिंदू एकता संमेलन पार पडले. या प्रसंगी हिंदू जागरण मंचाचे देवगिरी प्रांत सहसंयोजक शंकर दापके यांनी हिंदू धर्माचे आचार-विचार जपणे आणि टिकवणे आणि धर्माच्या ऐक्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
आपसातील तंटे मिटवून धर्माच्या ऐक्यासाठी सर्वांनी जातीपातींच्या बंधनात न अडकता एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शंकर दापके यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या ५ आयामांची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा मागोवा घेतला. व्याख्यात्या भक्ती देशमुख यांनी गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या महापुरुषांच्या पराक्रमाचे धडे आणि संतपरंपरेचा परिचय नवीन पिढीला करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.पंडित महाराज डाके यांनी हिंदू धर्मात संत परंपरेचे महत्त्व विषद केले. वारकरी संप्रदाय हा जातीभेद मानत नाही आणि दिंडी हे सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संतांची शिकवण नेहमीच प्रेरक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक चेतन नाईक यांनी मांडले. अभिजीत राजुरकर यांनी आभार मानले. शंतनु महाराज पाठक यांनी घेतलेल्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.





