धनश्री हरकळ ९७.२० टक्के गुणांसह शाळेत प्रथम; निकाल ८३.३३ टक्के, १४ विद्यार्थिनींना विशेष प्रावीण्य
प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नांचे विद्यार्थ्यांनी केले चीज
सेलू जि.परभणी : वालूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेने मार्च २०२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेत यशाची नवी उंची गाठली आहे. शाळेचा पहिल्याच बॅचचा एकूण निकाल ८३.३३ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी विविध श्रेणींमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या निकालाद्वारे माध्यमिक शिक्षकांशिवाय केवळ शाळेतील प्राथमिक शिक्षक आणि पालकांच्या परिश्रमपूर्वक मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अपार कष्टाचे चीज झाले आहे, असे दिसून येत आहे.
गुणवंत विद्यार्थिनींमध्ये धनश्री हरकळ हिने ९७.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. प्राची पुंड ९७% गुणांसह द्वितीय, सपना जीवने ९२.८०% गुणांसह तृतीय, साक्षी रोकडे ९२.६०% गुणांसह चौथा तर सई मळी ९१% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
विशेष म्हणजे शाळेतील १४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ७ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी पटकावली आहे. एकूण २५ विद्यार्थिनी या परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत.
विद्या हीच खरी संपत्ती आणि संस्कार हीच खरी ओळख मानून शाळेत देण्यात आलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे हे यश मिळाले असून वालूर येथील शिक्षणप्रेमी नागरिक, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पालकांनी दाखविला विश्वास आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत यासाठी महत्वपूर्ण असल्याचे मुख्याध्यापक एस.एस.देशमाने यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थी व पालकांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थी आणि शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





