मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची मदत तातडीने मंजूर
परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री हनुमान मंदिर, येथे २० जून रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, परभणी यांना पाठविलेल्या पत्रानुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या संतोष गडदे, आकाश सुरजोसे, नुमेश अगरवाल, सूरज कोपरटकर, श्रीकृष्ण गवारे यांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया, परभणी येथील जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित वारसांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, यशवाडी येथील दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने दखल घेत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तातडीने मंजूर केले आहे. शासन संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.



