उद्धव ठाकरे यांचे परभणीकरांना आवाहन, भाजपासह गद्दारांवर घणाघाती टीका

परभणी : जगात जर्मनी आणि भारतात परभणी काय असते, तर जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो, हा गद्दारांना गाडून टाकण्याचा परभणीचा इतिहास परत नव्याने लिहिण्याची आणि घडविण्याची संधी पुन्हा तुम्हाला मिळालेली आहे. असा निष्ठेचा निर्धार करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी, २८ जून २०२६ रोजी परभणी येथे आयोजित निष्ठावंतांच्या संवाद मेळाव्यात केले. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित या सभेला खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत दानवे, युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विरोधीपक्षनते आमदार आंबादास दानवे, आमदार डॉ.राहूल पाटील, अयोध्या पौळ यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
भाजप नसून ‘बाबर जनता पार्टी
आमचे हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम देणारे राष्ट्रीयत्व आहे. परंतु, ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देऊन रामाच्या नावाने लुटालूट करण्याचे दुकान ज्यांनी उघडले, ती भाजप नसून ‘बाबर जनता पार्टी’ आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. त्यांनी गद्दार खासदार आणि त्यांच्या दिल्लीतील लाचार बॉसवर आपल्या खास शैलीत आसूड ओढला. बाबरी पाडली गेली तेव्हा पळ काढणाऱ्यांचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले की, संकट काळात पळून जाणारे हे पळकुटे आज स्वतःला मोठे समजायला लागले आहेत. बाबरी पाडली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वाने ती जबाबदारी स्वीकारली होती. मुंबई दंगलीत शिवसैनिकांनीच मुंबईचे रक्षण केले, तेव्हा एकही भाजपचा कार्यकर्ता तिथे नव्हता. श्रीकृष्ण समितीच्या अहवालातही एकाही भाजप नेत्याचे नाव नव्हते.
हे तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोलताना हे ‘ऑपरेशन टायगर’ नव्हे; तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे, असे संबोधित मध्यप्रदेशात शिवराज सिंग चौहान यांचे पंख छाटून त्यांना बाजूला केले, कारण ते दिल्लीच्या शर्यतीत येऊ शकत होते. आता तीच वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असून पंतप्रधान पदाच्या शर्यती ते येऊ नयेत म्हणून त्यांचेही पंख कापण्याचे काम सुरू आहे. यातून फडणवीस यांचा आत्मविश्वास ढळत चालला असून ते हतबल झाल्याचे निरीक्षण ठाकरे यांनी नोंदविले. तर नितीन गडकरी यांच्या निष्ठेत इथेनॉलचे पाणी ओतून त्यांचे पंख आधीच छाटले गेले, असा टोला त्यांनी लगावला.
हृदयातील मशाली पेटत्या ठेवा
गद्दारांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, ज्यांना आपण मोठे केले, तेच आज लाचार होऊन बूट चाटायला गेले आहेत. वाघाचे कातडे पांघरून लांडगे झालेत. ज्यांच्याकडे स्वतःचा कोणताही विचार नाही, अशांचा वापर करून फक्त फेकून दिले जाईल. २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोदींच्या लाटेचा विचार न करता बाळासाहेबांच्या विचारांवर आणि मशालीवर विश्वास ठेवून मतदान केले. त्यांच्यावर विश्वास ठेवला ही माझी चूक झाली. त्याबद्दल माफी मागतो. पण आता पुन्हा एकदा या गद्दारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना धूळ चारण्याची संधी परभणीकरांना मिळाली आहे. परभणीचा इतिहास गद्दारांना गाडण्याचा आहे. आगामी निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदार शिवसेनेचेच निवडून आले पाहिजेत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अस्सल छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी आणि गद्दारीची कीड कायमची जळून खाक करण्यासाठी शिवसैनिकांनी आपल्या हृदयातील मशाली पेटत्या ठेवाव्यात, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी परभणीकरांना या लढाईत संपूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले, की सातत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या गद्दारांनी मताला विकलं, पक्षाला विकलं, मतदारांचासुद्धा अपमान केलेला आहे. म्हणून ज्याला जायचंय त्याला जाऊद्या, आपण आपला पक्ष, आपले विचार मोठे करू आणि ह्यांना आपण खाली जमिनीत गाडून त्याच्यावर आपला भगवा लावल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. प्रारंभी यशवाडी दुर्घटनेतील मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून हारतुऱ्यांनी स्वागत न करता प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा आसूड देऊन उद्धव ठाकरे आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.विवेक नावंदर, बाळासाहेब राखे यांनी केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने यांच्या नेतृ्त्वाखाली अनेकांचे पक्ष प्रवेश झाले. मेळाव्याला मोठ्या संंख्येने पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
राज्यात पुन्हा भगवा फडकवून दाखवू
भाजपाने टायगर नव्हे, तर ‘ऑपरेशन प्रभू श्रीराम’ सुरू केलेले आहे. ज्या श्रीरामाने यांना सत्ता मिळवून दिली. त्या आयोध्येतील रामाच्या मंदिरातल्या ५५० कोटीच्या दानपेट्या यांनी पळवल्याचा आरोप करीत हे यांचं हिंदुत्व आहे का, असा सवाल उपस्थित केला. तर खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता, हा पत्र्याच्या घरात राहणारा शिवसैनिक आज २००० कोटीचा मालक आहे म्हणे. म्हणून गद्दार दिसला की तुडवा, हे शिवसेनेचं “ऑपरेशन तुडवा” आहे. परभणी शिवसेनेची आहे, शिवसेनेचीच राहील, असे किती आंडू-पांडू-बंडू येतील आणि जातील, त्याची चिंता करू नका. या भागातले चारही आमदार तुम्ही निवडून देणार आहात. २०२९ ला १०० च्या वर आमदार आपले निवडून येतील आणि आपण स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात भगवा फडकवू आणि मग विकास काय असतो, ते यांना दाखवू – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते
…तर सहाही खासदार बाद ठरतील
कायदेतज्ज्ञ सांगतात, संविधानानुसार जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होतो, तेव्हा त्याला दोन तृतीयांश लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आवश्यक असतो; परंतु केवळ दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी स्वतः विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. या नियमानुसार, जर या देशात कायद्याचे राज्य असेल तर पक्षांतर केलेले सहाही लोकप्रतिनिधी कायदेशीररित्या बाद ठरले पाहिजेत. देशात कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. अजुनही लोकसभा अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे. पण त्यांना मर्जी चालवण्याची सूट नाही, त्यांनी संविधानाने दिलेला अधिकार वापरावा. कायद्याची बूज राखत अध्यक्ष योग्य न्याय करतील, असा विश्वास अजूनही कायम आहे. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

फोटो – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी परभणीत निष्ठावंतांचा मेळावा झाला. यावेळी मान्यवर उपस्थित होते..
फोटो- परभणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रविवारी आयोजित निष्ठावंतांच्या मेळाव्याला शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





