शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; आमदार डॉ.राहुल पाटील यांची माहिती
परभणी, दि. २३ : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या १०० नवीन शाखा, १०० आरोग्य शिबिरे आणि १० हजार नागरिकांच्या नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत तसेच टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात एकूण ३०० नवीन शाखा स्थापन करण्यात येतील, अशी माहिती परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमानिमित्त आर.पी. हॉस्पिटलच्या सभागृहात रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीपजी खोपडे, माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, कल्याणराव रेंगे पाटील, राम खराबे पाटील, सौ. अंबिका डहाळे आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना परभणीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
जिल्हाभरात शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात १०० शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात १०० आणि पुन्हा १०० अशा एकूण ३०० शाखांची स्थापना नव्याने होणार आहे. त्यासोबतच १०० आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांना त्यांच्या गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासोबतच २३ जानेवारीपर्यंत १० हजार जणांची नेत्र तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार डॉ. पाटील यांनी दिली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शब्दाला जागून आपण त्यांच्या विचारांचे अनुकरण करायचे आहे. त्यामुळेच जेवढे शक्य होईल तेवढे सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायचे आहे, असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन आपली एकता दाखवावी. सरकारवर संपूर्ण राज्यभरात नाराजी आहे, सत्तेत असलेल्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सरकारच्या धोरणांवर टीका करू लागले आहेत. केवळ चौकशीच्या भीतीपोटीच ते सत्ताधारी पक्षात आहेत. आपल्याकडे प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक असून भविष्यात लवकरच अनेक पक्षप्रवेश आपल्या परभणी जिल्ह्यात पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी यावेळी केला. या बैठकीत मीराताई रेंगे पाटील, डॉ. नावंदर, कल्याणराव रेंगे, अंबिका डहाळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.





