माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन, सरसकट आर्थिक मदतीची मागणी
सेलू : सेलू तालुक्यात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. त्यामुळे नुकसानीचे कोणतेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच मागील वर्षाचा व चालू वर्षाचा पीक विमा तात्काळ वितरित करून सेलू तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांना शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यात या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस चांगला होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि कशीबशी उसनवारी करून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, ऊस, कांदा, राजमा तसेच फळबागांची मोठ्या कष्टाने पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. कडक ऊन आणि पावसाच्या खंडामुळे शेतातील पिके मान टाकून करपण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत.हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या तीव्र आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनाम्यांचा वेळकाढूपणा न करता सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट थेट मदत द्यावी आणि पीक विम्याची रक्कम जमा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. हे निवेदन सादर करताना माजी आमदार विजयराव भांबळे यांच्यासह सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर बाजार समितीचे संचालक राजेंद्र लहाने, उपसभापती प्रकाशराव मुळे, पुरुषोत्तम पावडे, अप्पासाहेब डख, तालुकाध्यक्ष सुधाकर रोकडे, शुभम कदम, शरदराव आकात, नगरसेवक मिलिंदराव पवार, चंद्रकांत गाडेकर, जिवनराव आवटे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध नाईक तसेच प्रदिपराव रोडगे, हरिभाऊ सपाटे, श्रीनिवास सोळंके, बालाप्रसाद राठोड, विलासराव भुजबळ, बळीरामजी मगर, रमेशराव सावंत, दिलीपराव आकात, गिताराम खेडेकर, अमोलराव जाधव, ॲड. दत्ताराव आवटे, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठलराव ताठे, आप्पासाहेब रोडगे, सोमेश्वर गाडेकर, रामेश्वर गाडेकर, बाबुराव ताठे, अंबादासराव ताठे, शैलेश जाधव, सुनिलराव रोडगे आणि संजय बहिरट आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.





