आवश्यक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा
परभणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे आवश्यक होते, मात्र ती न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारची तिजोरी ही जनतेची आहे. त्यामुळे तात्काळ मदत देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अशोक सोनवणे, फारूक अहेमद, प्राध्यापक नागोराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, मनोहर वाकळे, महानगराध्यक्ष मुद्दसीर अहमद, संदीप खाडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, यंदा राज्यभरात पावसाने थैमान घातल्याने शेतकर्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नियमाप्रमाणे ओल्या आणि कोरड्या दुष्काळात खावटी वाटप केली जाते, मात्र यंदा ती करण्यात आली नाही. शासनाने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीचा आकडा हा ‘मटक्याचा आकडा’ आहे, असे ते म्हणाले. राज्यात वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचार प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिस खाते हे ‘बदमाशांचे खाते’ झाल्याचा गंभीर आरोप केला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, बिहार राज्याच्या निकालावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून आहेत. बिहार विधानसभेचा निकाल विरोधात गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का, अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. मतदार यादीबाबत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून फसवणूक सुरू असून ज्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगास खिंडीत पकडता येते, ते सोडून सर्व काही केले जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे फावत असल्याची टीकाही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केली.




