शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रवळगावात उपोषण
सेलू : राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे यांनी शनिवारपासून (९ ऑगस्ट ) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता.मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर व परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जवळपास ६० गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातुन पाणी मिळाले पाहिजे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी, राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसभर अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे, राज्याच्या सर्व विभागातील रिक्त पदाचा अनुशेष भरण्यात यावा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा झाली पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, सिंचनापासून वंचित असलेली ६० गावांची तात्काळ सिंचनाची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्यांसाठी रवळगाव भीमराव कोकाटे यांनी गावात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाचा रविववारी दुसरा दिवस होता. गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून कोकाटे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, पोलिस आणि प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवून आहे.





