सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यासह सेलू परिसरातही मोठी शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी, २९ जानेवारी रोजी सायंकाळी सेलू येथील साई नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रातील नागरिकांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली तसेच आठवणींना उजाळा दिला.
या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर यांची उपस्थिती होती. यावेळी सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रेक्षाताई भांबळे, रामनाना खराबे, रामेश्वर पोळ, तसेच प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर आणि पत्रकार मोहम्मद इलियास यांच्यासह अनेकांनी भावना व्यक्त केल्या.उपस्थितांनी अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम यावर प्रकाश टाकला. दादांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सेलू तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. सेलू येथील क्रांती चौकामध्ये दुपारी विविध क्षेत्रातील नागरिकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.





