प्रा. अनंत मोगल : स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाl ‘एक दिवस, एक पुस्तक’ उपक्रम
सेलू : नव्वदच्या दशकात ग्रामीण व्यवस्था आणि शेतकरीवर्गाने अनुभवलेले स्थित्यंतर आणि त्यात शेतकरीवर्ग ज्याप्रकारे उध्वस्त होत गेला, त्याचे भीषण वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे लेखक म्हणून भास्कर चंदनशिव यांच्याकडे पाहिले पाहिजे, असे मत प्रा. अनंत मोगल यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्यावतीने ‘एक दिवस, एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक ११ रोजी भास्कर चंदनशिव यांच्या ‘अंगारमाती’ या कथासंग्रहावर चर्चा आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्ताने प्रा. मोगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव टाकळकर होते. प्रा. मोगल पुढे म्हणाले की, नव्वदच्या दशकात व्यवस्थेने पिळून निघणाऱ्या शेतकऱ्यांचे अस्सल दुःख चंदनशिव यांनी त्यांच्या साहित्यकृतीतून मांडले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या लेखकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.
यावेळी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गोविंद भाऊ जोशी, रवी मुळावेकर, प्रा. डॉ. राजाराम झोडगे, सर्जेराव लहाने, विजय ढाकणे, गौतम सूर्यवंशी यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन उगीले यांनी केले, तर प्रास्ताविक चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. माधव गव्हाणे, ग्रंथपाल महादेव आगजाळ आणि पंडित जगाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.




