युवकांनी नोकरी देणारे बनावे : केंद्रीय मंत्री चिराग पासवान
परभणी येथे सामायिक नवउद्यम उभारणी केंद्राचे उद्घाटन; ३२९.५० लाख रुपयांच्या प्रकल्पातून सूक्ष्म उद्योजकांना अत्याधुनिक सुविधा
परभणी, दि. २८ : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी ही काळाची गरज असून, अन्न प्रक्रिया उद्योगातूनच शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास शक्य आहे. युवकांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ३२९.५० लाख रुपये खर्चाच्या सामायिक नवउद्यम उभारणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. रामराव वडकुते, खासदार संजय जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, कुलगुरू डॉ. इंद्र मणि, डॉ. भगवान आर्सेवार, विनय आवटे आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्री. पासवान म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि युवकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून महाराष्ट्र व बिहारसारखी राज्ये कृषीवर आधारित आहेत. अन्नधान्य उत्पादनात देशाने स्वावलंबन प्राप्त केले असून आता मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक बळ देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी मूल्यवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी अन्नाची नासाडी रोखण्याचे आणि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून त्याचे मूल्य वाढविण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या माध्यमातून अनेक युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली असून, अल्प भांडवलातून सुरू केलेले उद्योग आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत विश्वासार्ह ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे आवाहन करताना त्यांनी ‘मेड इन इंडिया’ ब्रँडला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सातत्यपूर्ण गुणवत्ता राखण्याचे महत्त्व विशद केले.
अधिक प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अडचणी येत असल्याचे सांगून त्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.भारताला ‘ग्लोबल फूड बास्केट’ म्हणून ओळख निर्माण व्हावी आणि जगातील प्रत्येक जेवणाच्या टेबलावर किमान एक भारतीय खाद्यपदार्थ असावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शेती संवर्धन आणि अन्न सुरक्षा यासाठी केंद्र शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हिंगोली व मराठवाडा भागातील कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि शिक्षण घेतलेल्या युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कृषी आधारित क्लस्टर विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी भरीव मदत करण्याचे आवाहन केले.
खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी मराठवाडा विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी क्लस्टर विकास आणि विपणन व्यवस्थेवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणातून परभणी येथे अन्न प्रक्रिया निर्मिती उद्योग उभारणीसाठी ठोस मदत करण्याची मागणी केली.कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी उद्योगातूनच यश मिळते आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, असे सांगितले. अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून देशात सुमारे २४ हजार उद्योग उभे राहिल्याचे नमूद करत त्यांनी परभणी परिसरातील शेतकरी विविध प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबी होत असल्याचा अभिमान व्यक्त केला. देशातील २१ राज्यांतील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याने हे विद्यापीठ भारताचे लघुरुप असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत सुमारे १,००० ते १,२०० लाभार्थ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचा लाभ मिळाला असून, नियमित प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. तसेच दरवर्षी बी.टेक.साठी ८०, एम.टेक.साठी १५ आणि पीएच.डी.साठी १० विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून या अत्याधुनिक केंद्राचा त्यांनाही मोठा लाभ होणार असल्याचे कुलगुरु डॉ. इंद्रा मणि यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भगवान आर्सेवार यांनी केले. प्राचार्य आर. बी. क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. चव्हाण आणि विना भालेराव यांनी केले.





