सेलू येथील एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे ३८ वे पुष्प उत्साह
सेलू : प्रा.आशा आपराद लिखित ‘भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय आणि अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे, पण संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे, हेच या आत्मचरित्रातून शिकायला मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.स्मिता देऊळगावकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे ३८ वे पुष्प बुधवारी (२५ मार्च) गुंफण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम महसूल अधिकारी भाग्यश्री किर्तनकार होत्या. प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलताना डॉ. देऊळगावकर पुढे म्हणाल्या की, प्रा.आशा आपराद यांच्या वाट्याला बालपणापासूनच अपमान आणि उपेक्षा आली. त्या घरच्यांना नकोशा होत्या, तरीही त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले. अपघात, आजारपण आणि गुलामीची वागणूक या चक्रव्यूहात त्यांचे विचारचक्र सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणशास्त्राची पदवी घेताना त्यांना स्वतःमधील सुप्त गुणांची जाणीव झाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळेच त्यांचे जीवन बदलून गेले. आशा आपराद यांचा हा जीवन प्रवास आपल्याला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता जगण्याची प्रेरणा देतो.या कार्यक्रमात डॉ.सविता संजय रोडगे यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वसुधा महेश खारकर व कुंदा चंद्रशेखर मुळावेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद ठाकर यांनी केले, सूत्रसंचालन मनीषा पांडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. हर्षा माकोडे, डॉ. सविता साडेगावकर, करुणा बागले यांची उपस्थिती होती.





