मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
सेलू : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सेलू पंचायत समितीने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, तेथे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) मधील ग्रामसखींच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तालुक्यातील ४९ ग्रामसखींना हा बहुमान मिळणार असून गट विकास अधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
सेलू तालुक्यात एकाच प्रशासकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने एकाच वेळी सर्व ठिकाणी उपस्थित राहणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिला संघटन, आर्थिक स्वावलंबन आणि नेतृत्व विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या उमेद अभियानातील ग्रामसखींना सन्मान देण्याच्या उद्देशाने ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा निर्णय घेण्यात आला आहे.पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या पाठबळाने व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात महिलांचे संघटन, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व विकास घडवून आणण्यात ग्रामसखींचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यांच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती गट विकास अधिकारी उदय जाधव यांनी दिली.





