१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश
परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी हे आदेश दिले असून, १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या काळात २४ तास लागू राहतील. यानुसार मुख्य कालवा लाभक्षेत्रातील वितरिका क्र. ४७ ते ६९ तसेच बी-५९, बी-६४, बी-६७, बी-६८ आणि बी-७० या शाखा कालव्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत पाणीवापर आणि हस्तक्षेपास सक्त मनाई करण्यात आली आहे. यात पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील गावांचा समावेश होतो.सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कालव्यांचे गेट उघडणे किंवा बंद करणे, संरचनेचे नुकसान करणे, भराव अथवा अस्तरीकरण फोडणे, पाण्याचा प्रवाह अडवणे अथवा वळवणे आणि कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाने तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.





