सेलू तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांना दिला धीर, मदतीची ग्वाही
सेलू (परभणी) : अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत महसूल आणि कृषी प्रशासनाचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सेलू, जिंतूर तालुक्यातील बाधित गावांना तसेच थेट बांधावर जाऊन भेटी दिल्या. नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. मदतीची ग्वाही दिली.सकाळी साडे दहा वाजता सेलू येथील निवासस्थानी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. आणि नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर सेलू तालुक्यातील काजळी रोहीणा आणि राजवाडी परिसरात पालकमंत्री यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महिला आणि शेतकऱ्यांशी थेट बांधावर संवाद साधला. या वेळी सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम, माजी जिप सभापती अशोक काकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, दगडोबा जोगदंड, शिवहारी शेवाळे, दिनकर वाघ, अशोक अंभुरे,भारत इंद्रोके, अनिल पवार,भास्कर पडघन,अजय डासळकर, कृष्णा शेरे, दामु काकडे, प्रकाश ताठे, बाळासाहेब काजळे, मंडळ अधिकारी वैशाली बिले, तलाठी शामसुंदर सूर्यवंशी, भास्कर काकडे आदींसह कृषी आणि महसूल मंडळाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.





