सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सेलू : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे उपोषण गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ पासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, भूसंपादन करताना जमिनीसाठी मिळणारा मोबदला अत्यंत कमी आहे. २०१४ च्या शासकीय रेडी रेकनरनुसार केवळ १ लाख ८० हजार रुपये प्रति एकर दर ठरवण्यात आला आहे, जो खूपच कमी आहे. या मनमानी धोरणाविरोधात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. १३ ऑगस्टरोजी दिलेल्या या निवेदनावर महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- जमिनीचे चुकीचे वर्गीकरण: बागायती जमिनींना कोरडवाहू किंवा हंगामी दाखवून कमी मोबदला दिला जात आहे.
- फळबागांचे चुकीचे मूल्यांकन : कृषी विभागाने फळबागांचे मूल्यांकन करताना झाडांऐवजी केवळ रोपांचे मूल्यांकन केले आहे.
- इतर मालमत्तेकडे दुर्लक्ष : विहिरी, पाईपलाईन आणि घरे यांसारख्या मालमत्तांचेही योग्य मूल्यांकन केलेले नाही.





