पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती : सेलू व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणी उपलब्ध होणार
परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत जिंतूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवनात झालेल्या बैठकीत परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे सिंचन, रोजगार, ऊर्जा निर्मिती आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.
बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विशेष मागणीनुसार सेलू व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणी उपलब्ध करून देणे तसेच पुर्णा प्रकल्पातून जिंतूर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठ्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे जिंतूर तालुक्यातील बळीराजाचा कायमचा जलसिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, येलदरी व सिद्धेश्वर धरणातून उजव्या कालव्याचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार असून या उपक्रमामुळे जिंतूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती ओलिताखाली येणार आहे.
बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. अब्दुल सत्तार, आ. विलास भुमरे यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक जयंत गवळी, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, पाणीपुरवठा, शेतीसाठी सिंचन, ऊर्जा निर्मिती, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार यांना नवे बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.





