डॉ.मनीषा घांडगे यांचे आवाहन, सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या गुणवंतांचा सत्कार

सेलू : “आजच्या काळात सामाजिक माध्यम ही मनं विचलित करीत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुष्टचक्रात स्वतःला अडकवून ठेवू नका. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान धारणा करा. मोबाईल, सोशल मीडियाची ही सतत वाढती गुलामी झुगारत, आत्मविश्वासाने उज्ज्वल भविष्य घडवा,” असे आवाहन डॉ.मनीषा घांडगे यांनी केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८७ वा वर्धापन दिन, दलितमित्र श्रीरामजी भांगडीया स्मृतिदिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेच्या कै. सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी आयोजित गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी, बालरोगतज्ञ डॉ. सत्यनारायण सोमाणी (परभणी) आणि डॉ.मनीषा घांडगे-डोंबे (सेलू) यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉ. विजेंद्र नागोरी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, उल्हास पांडे आणि निशा पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.घांडगे म्हणाल्या, “पालकांनी मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्षेत्र निवडू द्यावे. आपल्या इच्छांचे ओझे पाल्यांवर लादू नये आणि त्यांची इतरांशी तुलना करू नये.” या कार्यक्रमात संस्थेतील १०९ गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. वार्षिक अहवाल जयप्रकाश बिहाणी यांनी सादर केला. सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले, निशा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक पी.टी.कपाटे, पर्यवेक्षक डी.बी.घोगरे, शंकर बोधनापोड, गणेश माळवे, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, डॉ.यशवंत कुलकर्णी, अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन, किशोर कटारे, ज्योती कुंभकर्ण, बी.आर.पानझाडे, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर आदींसह नूतन कन्या प्रशालेतील तसेच संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
‘नूतन’ हे विद्यार्थी घडविणारे संस्कार केंद्र : डॉ. सत्यनारायण सोमाणी
“नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने मूल्ये आणि सामाजिक जाणीवांतून हजारो विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे हे एक संस्कार केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ध्येयवादी व्हावे. अभ्यास व परिश्रमातून मिळालेल्या यशाने आई-वडील, स्वतःचे आणि संस्थेचे नाव मोठे करावे,” असे प्रतिपादन डॉ. सत्यनारायण सोमाणी यांनी केले





