परिस्थिती नियंत्रणाखाली; पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून रूग्णांना दिलासा
परभणी : जिंतूर तालुक्यातील कोक गावात उद्भवलेल्या तीव्र अतिसार रोग (Acute Diarrhoeal Disease) उद्रेकावर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून परिस्थिती १६ ऑक्टोबर रोजी पूर्णपणे नियंत्रणाखाली आणली आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण हे या उद्रेकाचे प्राथमिक कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.
बाधित एकूण १३९ रुग्णांवर ग्रामस्तरावर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे ७७ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यापैकी ६६ रुग्णांना पूर्णपणे बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे, तर ११ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या रुग्णांपैकी केवळ २ गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय, परभणी येथे दाखल असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तातडीने उपाययोजना व नमुने तपासणी
आरोग्य विभागाने उद्रेकाचे मूळ कारण शोधण्यासाठी ५ पाणी नमुने, ५ विष्ठा (स्टूल) नमुने आणि टी.सी.एल. पावडरचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. सिव्हिल हॉस्पिटल, परभणी येथे संदर्भित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावात व परिसरात क्लोरीनेशन, स्वच्छता मोहिम आणि जनजागृती मोहिम वेगाने राबविली आहे.
दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. प्रशासन सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सुरक्षित पाणी वापरणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.” जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधून आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून रूग्णांना दिलासा
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी कोक गावाला भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून दिलासा दिला.
सद्यस्थितीचा आढावा घेऊन सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णतः सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सुरक्षित व उकळलेले पाणी वापरावे, वैयक्तिक व परिसरात स्वच्छता राखावी आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.





