अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा
परभणी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सेलू आणि जिंतूर येथे २४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, रस्ते दुरुस्त करणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे याबाबतही सूचना दिल्या.
सेलू येथील बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील पिकांचे, शेतीचे, घरांचे आणि सार्वजनिक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय पातळीवर कोणताही विलंब न करता सर्व नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यांनी पीक विम्याबद्दल माहिती घेतली, तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि अनेक भागांत विस्कळीत झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना दिले.
शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.





