नुकसानग्रस्त भागाची पाहाणी, शेतकऱ्यांना दिला धीर
परभणी : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यशासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून शेतकरी व नागरिकांना निश्चितपणे भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी दिली.
श्री. पाटील यांनी आज, गुरूवारी, २५ सप्टेंबररोजी स्वत: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राला भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे. शासनाकडून जास्तीत-जास्त मदत आपल्याला दिवाळीपूर्वी मिळवून दिली जाईल, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. श्री. पाटील यांनी आज पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, गंगाखेड तालुक्यातील धारासुर, परभणी तालुक्यातील साळापुरी, ब्रम्हपुरी गावाच्या शिवारातील पिकांची पाहणी केली. तसेच धानोरा काळे येथील तुडुंब वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्राची पाहणी केली. साळापुरी येथे अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या व सध्या प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेल्या तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईपणे चौकशी केली व त्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, तहसिलदार, कृषी, पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्यशासन अतिशय संवेदनशील आहे. कुठलेही गाव व शेतकरी मदतीपासून वंचित ठेवला जाणार नाही. एनडीआरएफच्या निकषानुसार सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जात आहे. परंतु अतिवृष्टीने झालेल्या मोठ्या नुकसानीची स्थिती पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अधिकची मदत निश्चितपणे दिली जाईल. पिकांशिवाय घरे, जनावरे याचे जे काही नुकसान झाले आहे, त्यासाठी देखील मदत केली जाईल.





