विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र; विविध पुरस्कारांनीही होणार सन्मान
परभणी : स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी फाऊंडेशन, परभणी यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून ती दोन गटांमध्ये विभागली आहे. गट अ (५ वी ते ७ वी) साठी “माझा आवडता वैज्ञानिक, वृक्षवल्ली आम्हां सोयरी, विश्व प्रेरिका मॉ जिजाऊ” हे विषय ठेवण्यात आले आहेत तर गट ब (८ वी ते १० वी) साठी “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संधी की धोका?, गांधी विचार – आजचा युवक” हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.स्पर्धेत दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१ व २००१ रुपयांची पारितोषिके तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. याशिवाय उत्साहवर्धन पुरस्कार (१००१ रुपये), तसेच सर्वोत्कृष्ट लाईक आणि व्ह्यूज पुरस्कार अशी विशेष पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत.दरम्यान, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ प्राप्त होत असल्यामुळे व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. सुधारित अंतिम तारीख आता २२ ऑगस्ट २०२५ अशी करण्यात आली आहे. निकाल ५ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्हिडिओ तयार करून संबंधित गटानुसार व्हाट्सअॅपवर पाठवायचा आहे. गट अ (५ वी ते ७ वी) साठी 9209023043 या नंबरवर तर गट ब (८ वी ते १० वी) साठी 9921144842 या नंबरवर व्हिडिओ व पेमेंटची पावती पाठवावी लागेल.वक्तृत्वकला ही विचारांची मांडणी, आत्मविश्वास वृद्धी, प्रभावी संवादकौशल्य आणि भाषेवरील प्रभुत्व विकसित करणारी महत्त्वाची कला असल्याने अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे आयोजकांनी सांगितले.





