शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे
पद्मश्री डॉ.अभय बंग यांचे मत, श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेचे सुवर्णमहोत्सवी पुष्प उत्साहात

सेलू जि.परभणी : जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकवणारे, समस्या सोडवत, आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखावे आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, याविषयीचे आत्मभान शिक्षणातून जागृत व्हावे, असे मत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी डॉ. अभय बंग यांनी गुंफले. “वेगळे शिक्षण शक्य आहे का?” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाले, “आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव झपाट्याने वाढतो आहे. बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसते. शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरलेला नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच आजच्या पिढीला जीवनातील जबाबदारीची जाणीव देणारे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारे कृतिशील शिक्षण महत्त्वाचे आहे.”
यावेळी पुरस्कारप्राप्त माजी विद्यार्थी उद्योजक महेश व वसुधा खारकर, रामेश्वर व किरण राठी, गायक यशवंत व सुरेखा चारठाणकर आणि मुद्रा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त सतीश व ज्योती कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ.अभय बंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सच्चिदानंद डाखोरे व विद्यार्थ्यांनी “या हातांनी रूजवू बीजे, सांगू मातीला…” हे शिक्षक अशोक लिंबेकर रचित गीत सादर केले. या प्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी सुवर्णकार हिने रेखाटलेले चित्र डॉ.बंग यांना भेट देण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुभाष बिराजदार आणि बाबासाहेब हेलसकर यांनी केले, तर अशोक लिंबेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक आसाराम लोमटे, संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे यांच्यासह परभणी, जिंतूर, मानवत, माजलगाव, मंठा, परतूर, सेलू शहरातील मान्यवर, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





