जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची माहिती
परभणी : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत महसूल व वन विभागाद्वारे‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजीच्या जन्मदिनापासून सुरू होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या संदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी माहिती दिली. सामान्य जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि तहसीलदार संदीप राजापुरे उपस्थित होते.या अभियानाची अंमलबजावणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात (१७ ते २२ सप्टेंबर) पांदन रस्ते विषयक मोहीम राबवली जाईल. यामध्ये शिव रस्ते व पांदन रस्त्यांचे संरक्षण, शेतावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांसाठी संमतीपत्र घेणे, ‘रस्ता अदालत’ आयोजित करून शेत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, शेत रस्त्यांची मोजणी व सिमांकन निश्चित करणे. दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) सर्वांसाठी घरे’ या उपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल. यात घर बांधण्यासाठी उपलब्ध शासकीय जमीन कब्जा हक्काने देणे. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमित करणे. पात्र लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप करणे, शहरांमधील गायरान जमिनींवरील नोंदी कमी करून अतिक्रमण नियमित करणे. तिसऱ्या टप्प्यात (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर) जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबिवणार आहेत.





