समृद्धी महामार्गबाधित शेतकरी १७ सप्टेंबरपासून आंदोलन व्यापक करणार
परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील दहा गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेले आहे. शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांनी उपोषणाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच कवडीमोल भावाने जमीन खरेदी करू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याशी खासदार जाधव यांनी फोनवरून संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. १७ सप्टेंबरपासून साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सत्य परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींना कायदा आणि नियमानुसार योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी खासदार जाधव यांनी केली. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाना खराबे, गणेशराव मुंडे, प्रशांत नाईक, सुंदरराव गाडेकर, दत्ता देशमाने, रमेश माने, विजय खरात, रघुनाथ टाके, सुनील लिपणे ढवळे महाराज, सर्जेराव थिटे भास्कर पडघन आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.





