सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने व्याख्यान, सामान्यज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
सेलू : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे एका धर्म, जातीचे नव्हते. तर रयतेचे स्वराज्य होते. माणूसपणाचा सन्मान करणारे शिवराय हे सर्वसमावेशक लोकराजे होते. असे प्रतिपादन श्यामसुंदर महाराज सोन्नर ( बीड ) यांनी केले.
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त शुक्रवार ( दि. २० ) रोजी साई नाट्यगृहात श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जाहीर व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख व्याख्याते म्हणून वारकरी विचार मंच, महाराष्ट्रचे अध्यक्ष श्यामसुंदर महाराज सोन्नर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव लहाने होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष रामराव गायकवाड यांची उपस्थिती होती. ‘ वारकरी संप्रदाय व छत्रपतींचे स्वराज्य ‘ या विषयावर पुढे बोलताना श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले की, ” कोणत्याही जात, धर्म, पंथ, स्त्री -पुरूष भेदभाव यांना थारा न देणारा, लोकशाही, समतेचा विचार रूजविणारा, स्त्री शक्तीचा सन्मान करणारा वारकरी संप्रदाय, छत्रपतींचे स्वराज्य आणि संविधान हे परस्पर पूरक आहेत. सर्वांनी अंधश्रद्धा सोडायला हवी. कुणा बद्दलही मनात द्वेष असू नये. सर्वच महापुरुषांनी एकतेची शिकवण दिली.” असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सच्चिदानंद डाखोरे, डॉ. भास्कर शिंदे यांनी जिजाऊ वंदना गायली. प्रास्ताविक रामराव गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माधव गव्हाणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रशांत देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. विलास खरात यांनी केले. व्याख्यानास प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, इंजि. भास्करराव कोलते यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य श्रोते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव बोबडे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सुरेश हिवाळे, संतोष ताल्डे, सचिन विखे, बजरंग आरकुले, साधना खरात, दिलीप दौड, तुकाराम मगर, अमोल बिडवे, राजेंद्र हुलसुरे, मुकुंद सोळंके, केशव टाकळकर आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.सामान्यज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानसार्वजनिक शिवजन्मोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत गट इयत्ता ४ थी ते ६ वी मध्ये आराध्या सावंत, माधवी मोगल, धनंजय चौधरी, समर्थ सुरवसे, समृध्दी भुतडा, गट इयत्ता ७ वी ते ८ वी रायबा भोसले, वैदेही गावंडे, प्रतीक्षा चिंचोलकर, तर गट इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये अथर्व तोडकर, मैथिली गावंडे, आरती सपाटे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक घेऊन यशस्वी झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तक, रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन किरण जाधव यांनी केले.





