फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन
निर्व्यसनी जीवनच “पांडुरंग भक्ती” : मधुसूदन महाराज दैठणकर
सेलू जि.परभणी : मोबाईल हा वेळ खाणारा राक्षस असून अतिसुविधांमुळे माणूस कमकुवत होत आहे. देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच असून पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी केले आहे.
सेलू शहरातील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी ‘महाभारत संदेश कथा’ गुंफताना राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला. स्वामीजी म्हणाले की, महाभारत हा केवळ इतिहास नसून जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जगातील सर्व समस्या सोडवण्याचे वैश्विक ज्ञान यात सामावलेले आहे. समाजात विकृती कितीही वाढली तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. कौटुंबिक एकजूट आणि माणसातील चांगूलपणाच त्याला खरे यश, समृद्धी आणि समाधान मिळवून देतो.
निर्व्यसनी जीवनच “पांडुरंग भक्ती”
याच सोहळ्यात सकाळी मधुसूदन महाराज दैठणकर यांची कीर्तन सेवा झाली. निर्व्यसनी जीवन हीच खरी पांडुरंग भक्ती असल्याचे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. आईने मुलांना सात्विकतेचे बाळकडू दिल्यास घराचे मंदिर होईल आणि पिढ्या बरबाद होण्यापासून वाचतील, असे विचार त्यांनी मांडले. या प्रसंगी मधुकराव पौळ, दत्तराव पावडे, पांडुरंग मगर, सुरेंद्र तोष्णीवाल, हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, विजय बिहाणी, सुधाकर पवार यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.





