सेलू तालुका दबाव गटाची प्रशासनाकडे मागणी
दुधना, कसुरा व करपरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दुधना, कसुरा आणि करपरा या तीन प्रमुख नद्यांच्या किनाऱ्यावरील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या जमिनींच्या नुकसानीबद्दल तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. सेलू तालुका दबाव गटाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या संदर्भात निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठा पूर आला आणि त्यामुळे नदीकाठची शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खरवडून गेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत नाराजी
नदीकाठची जमीन मोठ्या प्रमाणात खरवडून गेल्यामुळे तसेच शेतीत पिकांचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदाच्या अतिवृष्टीमुळे तसेच दुधना धरणातून नदीपात्रात केल्या विसर्गामुळे नदाकाठच्या दुतर्फा जमीन वाहून गेल्याने शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने अद्याप नुकसानग्रस्त भागाचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा (सर्व्हे) केलेला नाही, असे निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करून नुकसान भरपाईसाठी योग्य शासकीय योजनांतून मदत मिळवून द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदकांमध्ये सेलू तालुका दबात गटाचे सदस्य ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, मुकुंदराव टेकाळे, गुलाब साखरे, आबासाहेब भुजबळ, गणेश सोळंके, हरिभाऊ मगर, शिवप्रसाद शिंदे आदींसह शेतकऱ्यांचा समावेश आहे.





