महाभारत संदेश कथा : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
सेलू : आपल्या चांगल्या वागण्या आणि बोलण्यातूनच माणूस आपली खरी ओळख निर्माण करतो. जो व्यक्ती अथक आणि निरपेक्ष सेवा करतो, त्याच्यासमोर संपूर्ण जग नतमस्तक होते. कोणत्याही तंत्र किंवा मंत्रापेक्षा निरपेक्ष सेवेच्या माध्यमातूनच जग जिंकता येते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.
सोमवार, १६ मार्चरोजी महाभारत संदेश कथेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात मार्गदर्शन करताना स्वामीजी पुढे म्हणाले की, जातीच्या पलीकडे माणूस असतो आणि जात हा आपल्या देशावरचा कलंक आहे. हा कलंक मिटवून माणसाने माणसाशी माणसासारखे वागल्यास देश अधिक सुखी आणि सुंदर होईल. यावेळी त्यांनी महाभारतातील द्रौपदीच्या कौटुंबिक नात्यांचे उदाहरण दिले. अहंकाराचा त्याग करणे, तक्रार न करता परिस्थितीत राहणे आणि परस्परांचा सन्मान करणे हेच सुखी संसाराचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेम आणि मान मागून मिळत नसतो, तर तो आपल्या वर्तनातून मिळवावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
या कथेला माजी आमदार सुरेश जेथलिया, प्रेमचंद गुप्ता, माधवराव काकडे, गोविंद डालिया, नंदकिशोर परतानी, नारायण शर्मा, शैलेश तोष्णीवाल, विजय सोनवणे, हरिहर कवळे, गोविंद भूतडा, दत्ताराम रोडगे, गोविंद भाऊ जोशी, किशोर जोशी, महेश खारकर, हरिनारायण शर्मा, रामेश्वर राठी, तरुण सांगताणी आणि मधुकर माळकर यांची विशेष उपस्थिती होती.





