‘जगाच्या वेदनांना स्पर्श करणारा कवितासंग्रह : कुमार केतकर
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील गणेशनगर येथील भूमिपुत्र, साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त कवी प्रा. डॉ.वीरा राठोड यांच्या ‘ब्लेस अस ऑल’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मुंबईतील के.जी. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार येथे उत्साहात पार पडले. हा संग्रह डॉ. एल.एस.देशपांडे यांनी इंग्रजीत अनुवादित केला असून, रेड रिवर पब्लिकेशन दिल्ली यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला आहे. प्रकाशन सोहळा मंथन मल्टीलिंगवल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी श्री.केतकर म्हणाले, “वीरा राठोड यांची Bless Us All ही कविता जगातील सर्व दुःखाशी नाळ जोडणारी असून, ती सर्वांच्या कल्याणाचा संदेश देणारी आहे. प्रतिकाराची परंपरा साहित्यामध्ये नेहमी जिवंत राहते आणि हा प्रतिकार विरांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. बंजारा समाजाचा संघर्ष म्हणजे पॅलेस्टाईन व अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या वेदनांशी जोडलेला सार्वत्रिक अनुभव आहे
”कवी व चित्रकार संजिव खांडेकर म्हणाले, “बंजारा ही फक्त जमात नाही, तर ती जगण्याची कल्पना आहे. वीरा राठोड यांच्या कवितांमधून विस्थापित, भटके व डिनोटिफाईड जमातींचे संघर्ष सार्वत्रिक मानवी भावनांत परिवर्तित होतात. या कविता म्हणजे भटक्या कारवांसाठीचे मातृभूमी आहेत.”प्रा. डॉ.अश्विनी कुमार (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई) यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “राठोड यांच्या कवितेत हरवलेल्या प्रतिमा, विस्मृतीत गेलेली भाषा आणि मॅजिकल रिअॅलिझमची छटा आहे. या कवितांमधून दुःख व प्रतिकाराचे अनेक पैलू उलगडले जातात.”कवी वीरा राठोड यांनी आपल्या लेखनप्रवासाविषयी बोलताना सांगितले की, “माझी कविता म्हणजे माझ्या जगण्याचे प्रतिबिंब आहे.”या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किसन पवार, रेड रिवर पब्लिकेशनचे दिव्यज्योती सर्मा, साहित्य अभ्यासक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अभिजित देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सत्यवान हानेगावे यांनी केले. समन्वयाची जबाबदारी प्रा. डॉ. संतोष राठोड आणि पत्रकार प्रशांत पवार यांनी पार पाडली.





