सेलूतील नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
सेलू | प्रतिनिधी : शिक्षण घेऊन माणूस साक्षर होतो, परंतु शाळा आपल्याला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे साक्षर होण्यापेक्षा शाळेच्या व्यासपीठावर विविध कलागुणांना आविष्कृत होऊ द्यावे. कारण कला माणसाला सदैव जिवंत ठेवते. विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी आयुष्यात ‘सातत्य’ ठेवावे. केवळ अष्टपैलू न होता अष्टावधानी व्हावे, आणि सुसंस्कृत होण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी आणि मुंबईचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विशाल कुलथे यांनी केले.
दलितमित्र श्रीराम भांगडिया शतकोत्तर रजत जयंती निमित्त सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन विद्यालयाच्या गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डी. के.देशपांडे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सदस्य राजेश गुप्ता, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयदत्त बावणे, तसेच बाबासाहेब भाबट आणि मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शालेय आठवणींना उजाळा देताना, भावूक होत विशाल कुलथे म्हणाले की, याच शाळेत एकेकाळी आई-वडिलांनी मला आणून सोडले होते आणि आज त्याच शाळेत पाहुणा म्हणून येण्याचे भाग्य लाभले, आईवडीलही कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी मोठी पोचपावती आहे.
प्रगतीसाठी आयुष्यात ‘सातत्य’ आवश्यक
अष्टावधानी कसे व्हावे, यांचे संस्कार मला नूतन विद्यालयातून मिळाले, असे नमूद करून, पालकांनी पाल्यांना केवळ टक्केवारीच्या आकड्यांमध्ये न अडकवता त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. त्यांच्या सुसंस्कृत होण्याकडे अधिक लक्ष द्यावे, विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी आयुष्यात ‘सातत्य’ ठेवावे, असा सल्लाही अभिनेते विशाल कुलथे यांनी दिला.
श्री.देशपांडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती व कै.श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. सच्चिदानंद डाखोरे आणि संघाने “गे माय भू तुझे मी…” स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.
प्रमुख पाहुणे विशाल कुलथे यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सांस्कृतिक विभागाचे बक्षीस वितरण संचालन शिल्पा बरडे यांनी, तर क्रीडा विभागाचे संचालन गणेश माळवे यांनी केले. पर्यवेक्षक आर.एस.मोगल यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सान्वी हेलसकर व जय चौधरी यांनी केले. अशोक लिंबेकर व शैलजा कवुटकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सच्काचिदानंद डाखोरे आणि संचाने सादर केलेल्या ” या भारतात बंधुभाव नित्य वसू दे” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





