यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक : सर्वेश काबरा
सेलू : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला हवे. आईवडील आणि शिक्षक हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत, याची जाणीव सदैव ठेवावी, असे प्रतिपादन लेखापाल (सीए) सर्वेश काबरा यांनी केले.
श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा आणि निरोप समारंभ ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य शरद कुलकर्णी होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रूपाली होके, मुख्याध्यापक निशा पाटील आणि उपमुख्याध्यापक परसराम कपाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ॲड. रूपाली होके म्हणाल्या की, शिक्षणामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षण आणि मानसिक बळ वाढवण्यावर भर द्यावा. सामाजिक माध्यमांचा वापर सजगपणे करावा आणि आपल्या कर्तृत्वाने शाळेचे व पालकांचे नाव मोठे करावे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य शरद कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींनी परीक्षेला न घाबरता सामोरे जावे आणि उच्च शिक्षणातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दिव्या डंबाळे, उर्मिला बनसोडे, भाग्यश्री आल्डे, वैष्णवी मोगल आणि भक्ती कांबळे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. रेणुका अंबेकर यांनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय धापसे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना पाटणी, सुरेखा आगळे, यशवंत कुलकर्णी, सुरेश हिवाळे, भालचंद्र गांजापुरकर, किशोर ढोके, स्नेहल दगडू आणि बालाजी देऊळगावकर यांनी परिश्रम घेतले.





