जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ तर परभणीत ८८ ग्रामपंचायतींचा समावेश, मे महिन्यापर्यंत चालणार प्रभाग रचनेची प्रक्रिया
परभणी/प्रतिनिधी : माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून राजकीय क्षेत्रात मोठ्या हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्यातील तालुकावार ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ ग्रामपंचायती आहेत. त्याखालोखाल परभणी तालुक्यात ८८, गंगाखेड ७१, सेलू ६७, पूर्णा ६५, पालम ५३, पाथरी ४२ आणि मानवत व सोनपेठमध्ये प्रत्येकी ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्रालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभाग रचनेच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदारांना २० फेब्रुवारीपर्यंत गुगल अर्थचे नकाशे अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग व त्यांच्या सीमा निश्चित करायच्या आहेत. ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी तहसीलदारांच्या समितीमार्फत केली जाईल. उपविभागीय अधिकारी ११ मार्चपर्यंत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील आणि जिल्हाधिकारी १७ मार्चपर्यंत संक्षिप्त तपासणी करून तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवतील.निवडणूक आयोगाने २३ मार्चपर्यंत प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर ३० मार्चपर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी ७ एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. १३ एप्रिलपर्यंत हरकती स्वीकारून २१ एप्रिलपर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाईल. अखेर २८ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल आणि ४ मे रोजी जिल्हाधिकारी या अंतिम प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता देतील. या सविस्तर कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामीण भागातील इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.





