पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी : जिल्ह्यातील येलदरी (ता.जिंतूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमुळे येलदरी धरणातून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारपासून टप्प्याटप्प्याने दारे उघडण्यात आली. विसर्ग वाढविण्यात आला. सोमवारी, १८ ऑगस्टरोजी दुपारी एक वाजता धरणाच्या दहा दरवाजातून विसर्गएकूण ५३,३६०.५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. तर रात्री आठ वाजता वाढून तो ६४,३२१ क्युसेक वर पोहोचला आहे.
यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सकाळी १२:३० वाजता धरणाचे गेट क्रमांक १, ३, ५, ६, ८ आणि १० प्रत्येकी १.५ मीटरने उघडण्यात आले. सध्या, गेट क्रमांक २, ४, ७ आणि ९ हे १ मीटरने उघडे असून, त्यातून एकूण ५३,३६०.५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या २७०० क्युसेक पाण्यामुळे पूर्णा नदीतील एकूण विसर्ग ५६,०६० क्युसेकपर्यंत पोहोचला. रात्री आठ वाजता येलदरी धरणाचे गेट क्र. १ आणि १० प्रत्येकी २ मीटरने, तर गेट क्र. २, ३, ४, ५, ६, ७, आणि ८ प्रत्येकी १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या गेटमधून ६४३२१.३६ क्युसेक (१८२१.३८ क्युमेक) इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे.
जलविद्युत प्रकल्पातून २७०० क्युसेक पाण्याचा विसर्गही सुरू आहे. त्यामुळे, येलदरी धरणातून एकूण ६७०२१ क्युसेक (१८९८ क्युमेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, विसर्गाचे प्रमाण कमी किंवा जास्त करण्यात येईल. प्रशासनाने पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.





