नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सेलू जि.परभणी : निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे, प्रकल्पातून दुधना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पाचा पाणीसाठा ७५% पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या निर्देशानुसार, सध्या धरणाची पातळी ४२५.११० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे, प्रकल्पाचे गेट क्रमांक १, २, १९ आणि २० प्रत्येकी ०.२ मीटरने उघडून २६३८.७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाण्याची आवक पाहता, सायंकाळी ५ वाजता आणखी गेट क्रमांक ३, ४, १७ आणि १८ हे प्रत्येकी ०.२ मीटरने उचलून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या प्रकल्पाच्या एकूण ८ दरवाजातून ५२७७.४८ क्युसेक (१४९.४४ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. पुढील काळात पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्गाचे प्रमाणही त्यानुसार समायोजित केले जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे. या पार्श्वभूमीवर, दुधना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.





