पाथरी : महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे राज्यातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करण्याचा मान पाथरीसह परभणी जिल्ह्यातील पाच महिलांनी मिळवला आहे. शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या मोहिमेत अवघ्या साडेतीन तासांच्या प्रयत्नांत त्यांनी ५,४०० फूट उंचीवरील शिखर गाठले.अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बारी गावच्या हद्दीत वसलेले कळसुबाई शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न मानले जाते.
या शिखर सर करण्यासाठी पाथरी तालुक्यासह जिल्ह्यातील ज्योत्सना पौळ, रुक्मिणी जाधव, किरण धर्मे, रंजना जाधव आणि रोहिणी दिगे या पाच जणींनी सहभाग घेतला.पावसाळ्यात ओलसर वाटा, निसरडे दगड, चिखल व सतत बदलणारे हवामान यामुळे चढाई अधिकच कठीण झाली होती. मात्र परस्परांना दिलेले मानसिक बळ आणि उत्साहाच्या जोरावर त्यांनी हे आव्हानात्मक शिखर यशस्वीरीत्या सर केले.शिखरावर पोहोचताच सर्वांनी तिरंगा फडकावला आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यांत अभिमान व समाधान झळकत होते.मोहिमेचा अनुभव सांगताना गिर्यारोहकांनी स्पष्ट केले की, थकवा, पावसाचा मारा आणि निसरडी वाट ही मोठी अडचण होती. पण एकमेकांच्या पाठबळामुळेच हे स्वप्न साकार झाले. कळसुबाई सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असून, परभणीच्या या पाच महिलांनी ते पूर्णत्वास नेल्याने जिल्ह्यात त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





