खासदार संजय जाधव यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी, दि.१५ : परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे स्थानिक खासदार संजय जाधव यांनी आज, सोमवार, १५ सप्टेंबर रोजी केली. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पूर येऊन काही जनावरेही दगावली आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली असून, शेतकऱ्यांपुढे कर्जफेडीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे, शासनाने निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे, असे खासदार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाकडे परभणी जिल्हा ओला दुष्काळ म्हणून तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत, नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि ओला दुष्काळाचे अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.





