निम्नदुधनाच्या दहा दरवाजातून विसर्ग, पाणी पातळीत वाढ, सेलू-राजवाडी-वालूर वाहतूक बंद
सेलू : निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून एकूण दहा दरवाजातून १०,०९० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून राजवाडी येथील पुलावरती जवळपास दहा फूट पाणी वाहात आहे. मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे सेलू- राजवाडी-वालूर वाहतूक बंद झाली आहे.
दरम्यान, सुरक्षिततेसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने याठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना प्रतिबंध केला आहे.निम्न दुधना धरणातून गेट क्रमांक ०१, ०२, ०३, १८, १९ आणि २० हे ०.३ मीटरने उघडण्यात आले त्यातून ६०५४ क्युसेक (१७१.४३ क्युमेक) पाणी दुधना नदीत सोडले जात आहे. मध्यरात्री ०१:०० वाजता, गेट क्रमांक ०४, ०५, १६ आणि १७ देखील ०.३० मीटरने उघडून आणखी ४०३६ क्युसेक (११४.२८ क्युमेक) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण विसर्ग १०,०९० क्युसेक (२८५.७१ क्युमेक) इतका झाला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने, नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहावे. कृपया कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये. यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळता येईल. आवश्यकतेनुसार धरणातील पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाईल, असे कार्यकारी अभियंता जालना पाटबंधारे विभागाने कळविले आहे.






