भौतिकशास्त्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम, आर्थिक परिस्थितीवर केली मात
सेलू : तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी आरती जगन्नाथराव रोडगे हिने अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एमएससी फिजिक्स म्हणजेच, भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करत आरतीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. २० सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच कुलगुरू मनोहर चासकर, प्र .प्र.कुलगुरू अशोक महाजन यांच्या उपस्थितीत आरतीचा सुवर्णपदक व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी येथे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता.
सेलू शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर रवळगाव आहे. येथील मुले, मुली पहाटे चार वाजल्यापासून सायकलद्वारे आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करतात. गावापासून सायकल वरून सुरू झालेला हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहचविणारा ठरला आहे. रवळगावातील अनेक विद्यार्थी वर्ग एक व वर्ग दोन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच तत्सम पदापर्यंत पोहोचलेले आहेत. हाच आदर्श उराशी बाळगून तेथील इतर विद्यार्थ्यांची देखील वाटचाल सुरू आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील आरती जगन्नाथराव रोडगे हिचा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणातील ध्येय व स्वप्न गाठण्यासाठी काटेरी रस्त्यावरून प्रवास सुरूच होता. रवळगाव येथून सायकल द्वारे दहावी व पदवीपर्यंतचे शिक्षण सेलू येथे पूर्ण केल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी केवळ आर्थिक अडचणीमुळे तीने एक वर्ष घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुठलाही बाऊ न करता ते एक वर्ष मागे टाकत, पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एमएससी भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रवेश घेतला. आणि कठीण परिश्रम करून संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवत सुवर्णपदक पदकाला गवसणी घातली.
आरतीचे वडील जगन्नाथ रोडगे चार चाकी वाहन चालवून कुटुंबाची उपजीविका भागवतात. तर आई गृहणी आहे. संपूर्ण यशात आई वडील, भाऊ व रवळगाव येथील गावकरी मंडळी तसेच सेलू व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरुजन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे आऱतीने सांगितले. या यशाबद्दल आरती आणि रोडगे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





