कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांचे मत, सेलूतील कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात
सेलू : शेतीत अनेक प्रश्न, आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी आणि शेतीच्या सर्वंकष विकासासाठी शेतकऱ्यांची एकजूट आवश्यक आहे. वडिलोपार्जित शेती विकू नका, त्यात शक्य असल्यास वाढ करा, असे आवाहन करून सगळ्यांना सांभाळण्याची ताकद, क्षमता ही आजही केवळ शेती आणि खेड्यातच आहे, हे करोना काळात प्रकर्षाने समोर आले आहे, असे मत कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (छत्रपती संभाजीनगर) जीवनसाधना पुरस्काराबद्दल विजयअण्णा बोराडे यांचा सेलू् परिसरातील नागरिकांच्या वतीने शनिवारी, २० सप्टेंबर रोजीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी संचालक (कृषी विस्तार) डॉ.उत्तमराव इंगळे आणि मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार असे सन्मानाचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख वक्ते म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख (नांदेड), माजी मुख्य शास्त्रज्ञ पाणी व्यवस्थापन डॉ.रामराव रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संयोजन समितीचे गोविंदभाऊ जोशी प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, आश्रोबा डख, वल्लभ लोया, दत्तराव पावडे, पांडुरंगराव मगर उपस्थित होते.बदलत्या हवामान आणि वातावरण बदलानुसार घ्यावयाची पिके, उत्पादन, शेतीची आजची स्थिती यासह शैक्षणिक आणि सामाजिक बदलांवर परखड भाष्य विजयअण्णा बोराडे यांनी केले. बोराडे म्हणाले, ” रासायनिक खते आणि औषधांच्या मार्यामुळे मृतवत झालेल्या आणि कस हरवलेल्या मातीचे महत्त्व जाणा. रासायनिक आणि नवीन तंत्रज्ञानाच्या भरवशावर शेती करा. नव्या जुन्याची सांगड घालून पुढे जा. शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर पाऊस वर्षभरात कोणकोणत्या तारखेला पडणार आहे. हा हवामानाचा अंदाज कळायला हवा. नवीन शेती घ्या, पण वडिलोपार्जित शेती सांभाळा ती विकू नका, मुलामुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी केले. विजयअण्णा बोराडे यांचा परिचय गोविंदभाऊ जोशी यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्तराव पावडे यांनी केले. अर्जुन कसाब, सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दिक्षित आणि गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत सादर केले. कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था, केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्था, यशवंत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, महेश खारकर, किशोरभाऊ, जोशी, मुकेशराव बोराडे, विनोद बोराडे, ज्ञानोबा बोराडे, चंद्रकांत बोराडे, उध्दव सोळंके, रामभाऊ शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी संघटनेचेज्ञकार्यकर्ते, परभणी, सेलू, मानवत, माजलगाव, परतूर, मंठा, जिंतूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयअण्णा हे कृषी पंढरीचे वारकरी : श्रीकांत देशमुख
भूमीला ईश्वर मानणारी मूळ परंपरा शेतीची आहे. त्यामुळे शेती कशी असावी. शेतकरी स्वाभिमानी कसा होईल. याचे चिंतन करणारे विजयअण्णा बोराडे हे कामात ईश्वर शोधणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणारे, विद्यापीठाच्या कक्षेच्या पलिकडे जाऊन शेतीला वैभव प्राप्त करून देणारा माणूस आहेत. ते कृषी पंढरीचे वारकरी आहेत. शेतीचा चालता फिरता ज्ञानकोश आहेत. या ज्ञानकोशाची पाने उलगडून पाहावीत. हा कृतज्ञता सोहळा म्हणजे आजच्या भगीरथाचा सन्मान आहे. हा अण्णांच्या कार्याचा सन्मान आहे. ” असे ते म्हणाले.





