सेलू तालुक्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात दुधना, करपरा आणि कसुरा या तीन प्रमुख नद्यांच्या काठी असलेल्या ३७ गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून, या गावांचा समावेश ‘पुराचा धोका असलेल्या गावांच्या यादीत’ करण्याची मागणी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सेलूच्या तहसीलदारांना सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.सेलू तालुक्यातील दुधना नदीच्या लगत वलंगवाडी, सोन्ना, आंबेगाव दिगर, करडगाव, मोरगाव, खुपसा, खेर्डा, डिग्रस, पिंपरी बुद्रुक, पिंपरी खुर्द, शिराळा इत्यादी गावांचा समावेश आहे. तसेच बोरकिन्ही, नरसापूर, नांदगाव, देवगाव, गिरगाव खुर्द, गिरगाव बुद्रुक, सावंगी पी.सी., खैरी, निरवाडी खुर्द, निरवाडी बुद्रुक, गोसावी पिंपळगाव, वाई, राव्हा, पार्डी कौसडी, राजूरा आणि आडगाव दराडे ही गावेही करपरा नदीच्या लगत आहेत. याशिवाय, म्हाळसापूर, कुंडी, गोहेगाव, धनेगाव, डिग्रस जहागीर, ढेंगळी पिंपळगाव, आहेर बोरगाव, सिध्दनाथ बोरगाव आणि झोडगाव ही गावे कसुरा नदीकाठी येतात.नद्यांना पूर आल्याने या गावांच्या शिवारातील शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे साहित्य, जनावरे, जनावरांचा चारा, ठिबक, तुषार, पाइपलाइन, विहिरीची पडझड यासह अनेक गोष्टींची हानी झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने तसेच संततधार व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी या नुकसानीचे कोणतेही पंचनामे केलेले नाहीत. या सर्व गावांना पुराच्या धोका असलेल्या गावांच्या यादीत समावेश करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच, उपसरपंच आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. या वेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवहरी शेवाळे, भास्कर पडघन, दगडोबा जोगदंड, सरपंच गोविंद मगर, भारत इंद्रोके, विकास आढे, भागवत मगर, शशिकांत शिंदे, रामदास साखरे, माणिक साखरे, उद्धव मगर, देवानंद साखरे, ज्ञानोबा मगर, कृष्णा चव्हाण, प्रल्हाद शेळके, आनंदराव मगर, श्रीधर मगर, पिराजी अंभुरे, विजय बोचरे, दतराव काष्टे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.




