परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती
परभणी : राज्यात जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतपॅकेज जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे. परभणी जिल्ह्यातील संपूर्ण ५२ मंडळे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास १०० टक्के बाधित क्षेत्र मानले जाते, या निकषाप्रमाणे परभणीतील सर्व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
जिंतूर रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ.केदार खटींग, सौ. प्रेरणा वरपुडकर, बाळासाहेब जाधव यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की,
या पॅकेजनुसार या जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांतील आपदग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील प्रत्येक बळीराजाची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना भक्कम आधार मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी थेट समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले. प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली, सर्वच बाधित जिल्ह्यांतील प्रशासनाशी स्वतः संपर्क ठेवत त्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली आणि हे मोठे पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना आधार दिला. या मदतपॅकेज अंतर्गत विविध सवलती व आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) च्या निकषात नसतानाही विहिरींसाठी रूपये ३०,००० प्रति विहीर अशी देशात पहिल्यांदाच मदत जाहीर केली गेली आहे. मृत कुटुंबियांना ४ लाख, तर जखमींना रूपये ७४,००० ते रूपये २.५ लाख इतकी मदत मिळणार आहे. घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी रूपये ५,०००, तर ४८ तासांपेक्षा जास्त पाण्यात राहिलेल्या घरांना रूपये १०,००० मदत दिली जाईल. दुकान/टपरीधारकांना रूपये ५०,०००, कपड्यांचे नुकसान झाल्यास रूपये ५,०००, झोपडीचे नुकसान झाल्यास रूपये ८,०००, तर घराचे नुकसान झाल्यास रूपये १.२ लाख आणि अंशतः पडझड झाल्यास रूपये ६,५०० मदत मिळणार आहे. जनावरांच्या नुकसानीसाठी आता मर्यादा न ठेवता मृत पावलेल्या सर्व जनावरांच्या नुकसानीची मदत देण्यात येणार आहे. हेक्टरी अनुदान तसेच ३ हेक्टरपेक्षा जास्त पीक नुकसानीसाठी अतिरिक्त रूपये १०,००० कोटी मदत देण्यात येईल. येणाऱ्या रब्बी हंगामासाठी प्रति शेतकरी रूपये १०,००० मदत दिली जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी रूपये १५,००० कोटी रुपयांचा राखीव निधी ठेवण्यात आला आहे. यासोबतच दुष्काळी सवलतींचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठन, वसुली स्थगिती, वीजबिल माफी, शाळा-कॉलेज फी माफी आदी उपाययोजनांचा यात समावेश आहे. तसेच शेतपंपाची वीज तोडू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.




