फडणवीस सरकारच्या पॅकेज धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांचा तिव्र धिक्कार
सेलू : येथील तहसील कार्यालयावर १० ऑक्टोबर रोजी किसान सभा व माकपच्या वतीने तिव्र धिक्कार निदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारने पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि फसव्या शासन आदेशाची होळी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने एक हेक्टरसाठी ८,५०० रूपयांपेक्षा जास्त भरपाई मिळू नये असे आदेश दिले असून संपूर्ण क्षेत्राला भरपाई मिळणार नाही. परभणी जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणी १८ लाख हेक्टर असून फक्त ८६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत बाधित दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीतून वगळले गेले असून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या भरपाईपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले असल्याचा आरोप केला.ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, एकरी ५०,००० रुपये भरपाई द्यावी, शेतमजूरांना ३०,००० रुपये श्रम नुकसान भरपाई द्यावी, तसेच सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र विना नोंदणी सुरू करावे. या मागण्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. नायब तहसीलदार मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, पाटील दत्तुसिंग ठाकुर, सुभाष शहाणे, विष्णू चव्हाण, शेख बाबुलाल, नारायण पवार, जाहेद घौरी, श्याम शेरे, दादाराव ढवळे, भागोजी गायके, पुंजाजी फाटे, पार्वती घोडके यांसह अनेक शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





