सेलू बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे यांची मागणी
परभणी : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सीसीआयच्या खरेदी प्रक्रियेत तातडीने बदल करण्याची मागणी वेग घेऊ लागली आहे. सध्या सीसीआयने प्रति एकर ५.६० क्विंटल इतकी खरेदी मर्यादा निश्चित केली असून ती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा खूपच कमी असल्याने नाराजी निर्माण झाली आहे.सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सीसीआय महाप्रबंधक आणि राज्य शासनाला निवेदन देऊन ही मर्यादा वाढवून प्रति एकर १२ क्विंटल करण्याची मागणी केली आहे. वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि प्रत्यक्षातील जास्त उत्पादन यांचा विचार करता विद्यमान मर्यादा शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने हा मुद्दा गंभीर बनला असून मर्यादा वाढविल्यास योग्य मोबदला मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकरी संघटनांनीही या मागणीला पाठिंबा देत तातडीने निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले.





