डॉ.मंजुषा कुलकर्णी यांचे प्रतिपादन, सेलूतील केशवराज व्याख्यानमालेला प्रतिसाद
सेलू जि.परभणी : मनाची प्रगती ही काळाची गरज असून आत्मिक प्रगतीही महत्त्वाची आहे. आनंदी जीवनासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. वाणी ही माणसाला एक तर सुखी करते किंवा दुःखी करते. म्हणून शब्द जपून वापरावेत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक तथा मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गुरुवारी १८ डिसेंबर रोजी केले.
सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘ चला जगूया ऐसें जीवन ‘ या विषयावर त्यांनी गुंफले. स्व.ॲड.वसंतराव खारकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेश खारकर हे होते.
पुढे बोलताना डॉ. मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की, ” जो घरच्या स्त्रीचे कौतुक करतो तो सुखी होतो. जगण्याचा मार्ग आपल्या सकारात्मक दृष्टीने आपण सोपा करू शकतो. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट करा. आनंदी जीवनासाठी मनातल्या, भावनांच्या गाठी सोडवणे आवश्यक. ज्याचे मन सुंदर त्याचे जीवन सुंदर असते. कुटुंबाला वेळ द्यायला हवा. आनंद वाटता यायला हवा. तर जीवन सुखी होते. ” असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ मंजूषा कुलकर्णी यांनी स्वलिखित पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली.अध्यक्षीय समारोप ॲड.जोशी यांनी केला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय धारासुरकर, पाहुण्यांचा परिचय योगेश ढवारे, सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर, तर आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.





