पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी;क्रांतीज्योत महोत्सवाचा प्रारंभ
परभणी : सावित्रीच्या लेकींनी निर्भयपणे ध्येयाकडे मार्गस्थ व्हावे, परिश्रमातून यश साध्य होते, अशा भावना पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केल्या. विद्या निकेतन संस्थेच्या सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे क्रांतीज्योती महोत्सवांतर्गत ‘विद्यार्थिनींशी संवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थिनींना शाळेत जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर परभणी पोलिस दल भक्कमपणे त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जया जाधव तर प्रमुख अतिथीस्थानी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, मोंढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत आदि मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थीदशेत मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये, असे आवाहन जी. जी. सोनेत यांनी केले. पूजा ठोके, अनुजा जगताप यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कृतज्ञता गीत’ सादर केले. सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा देशमुख, अरुणा पाटील, प्रणिता पांचाळ, सीताराम ठाकरे, रमेश मुळे, विठ्ठल शिंदे यांनी परिश्रम घेतले.





