परभणीतील संमेलनात कथाकथन, काव्यवाचनाची संधी
सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावीच्या ६ विद्यार्थिनींची परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तिसऱ्या अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे.
१५ जून २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमेअंतर्गत, अक्षर आनंदचे प्रमुख विनोद शेंडगे व त्यांच्या चमूने जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांची या संमेलनासाठी निवड केली आहे.या संमेलनात कथाकथन सत्रात अंकिता फड, काव्यवाचनासाठी आराध्या कटारे व दाक्षायनी इघवे तर पुस्तक वाचन अभिप्राय सत्रासाठी जान्हवी नवघरे, संचिता मुजमुले आणि संस्कृती शेरे या विद्यार्थिनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करतील.
हे संमेलन १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात संपन्न होणार आहे.संमेलनाचे स्वरूप आणि कार्यक्रमसंमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता नावनोंदणीने होईल. त्यानंतर वाचन गप्पा, उद्घाटन सत्र, कथाकथन आणि बाल कवी संमेलन पार पडेल. दुपारच्या सत्रात एकपात्री लघुनाटिका, ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर गटचर्चा आणि शेवटी बालवाचक सन्मान सोहळा व समारोप सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर यांच्या हस्ते होणार असून, रामेश्वर नाईक व शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनाध्यक्ष म्हणून कु. कोमल डाखोरे तर स्वागताध्यक्ष म्हणून कु. अनन्या खवले जबाबदारी पार पाडतील. समारोप सत्राला कुलगुरू डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषी भूषण कांतराव देशमुख आणि पक्षी अभ्यासक माणिक पुरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकया सर्व विद्यार्थिनींना शिक्षक योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके आणि ज्येष्ठ शिक्षकांच्या उपस्थितीत मार्गदर्शक शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, श्री के. बा. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सचिव महेश खारकर आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





