डॉ.दिवाकर कुलकर्णी यांचे प्रतिपादन, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम

सेलू जि.परभणी : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला हिंदुत्वाचा विचार हे केवळ धार्मिक तत्व नसून ते समाजप्रबोधनाचे एक मोठे कार्य होते. त्यांची देशभक्ती, सामाजिक संस्कृती, भाषा आणि परंपरा यातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची जाणीव निर्माण होते, असे विचार डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत “हिंदुत्वाचे पंचप्राण” या पुस्तकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी राजभाषा गौरव दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त (पुण्यतिथी) २८ फेब्रुवारी रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपेंद्र बेल्लुरकर होते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्यांनी त्याग, समर्पण आणि निष्ठा ही तत्वप्रणाली अंगीकारली होती. हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याप्रसंगी जिल्हा स्तरावरील ‘उत्कृष्ट ग्रंथपाल’ पुरस्कार प्राप्त महादेव आगजाळ आणि अर्चना आगजाळ यांचा ग्रंथालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री धामणगावकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके, सदाशिव महाजन आणि सर्जेराव रोडगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





