ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे आवाहन
तारूण्य त्यागाने शोभते : संजय महाराज पाचपोर
सेलू : आजच्या काळात वृक्षतोड हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या नावाने प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावावी. पडीक जमिनीवर सुखी भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन आणि गाथाबन तयार करा, असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांनी केले आहे.
अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात बुधवार दिनांक १८ रोजी त्यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपले नवीन वर्ष पाडव्यापासून सुरू होते. नवीन वर्षाचे स्वागत निसर्गही करतो. या निमित्ताने प्रत्येक घरात आणि गावात पारायणे व्हावीत. प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे, निर्व्यसनी जीवन जगावे आणि जातमुक्त व्हावे असा संकल्प करायला हवा. अठरापगड जाती जेव्हा एकत्र येतील, तेव्हाच भारत अधिक समृद्ध होईल. या सोहळ्यास बाळूमामा झमकडे, गंगाधर आडळकर, रामप्रसाद साबू, राजेंद्र प्रसादजी मनियार, मुकुंद आष्टीकर, शिवनारायणजी नंदकिशोरजी बाहेती, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. आशिष मेहता, प्रताप शिंदे, अप्पू सोळंके, नंदा भुतडा यांची विशेष उपस्थिती होती.
तारूण्य त्यागाने शोभते : संजय महाराज पाचपोर
दुसऱ्या सत्रात बोलताना गोसेवक ह.भ.प. संजय महाराज पाचपोर म्हणाले की, मानवी जन्मात प्रपंचासाठी वयाची गरज असली तरी परमार्थासाठी वयाची अट नसते. तारुण्य हे भोगाने शोभत नसून केवळ त्यागाने शोभते. मंगळवार दिनांक १७ रोजी रात्री फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यातील कीर्तनाचे पुष्प गुंफताना त्यांनी हे विचार मांडले. भगवंताला निरपेक्ष भक्ती आवडते आणि अशा व्यक्तींची अपेक्षा ईश्वर व समाज पूर्ण करतो. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या यशामागे मोठी साधना आहे. मागील अनेक वर्षांपासून पंडित महाराज डाके यांनी २०० गावांत या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पारायणांच्या माध्यमातून मोठी धर्मजागृती सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.





